पाणंद रस्त्यांची कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
- दर आठवड्याला आढावा घेणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शेतातील विविध उत्पादनांच्या वाहतुकीसाठी शेत पाणंद रस्त्याची सुविधा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. याबाबत शासनाने प्राधान्याने विचार करुन जिल्ह्यातील ५१४ मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्त्याच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली आहे. यातील ४५५ पाणंद रस्त्याच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून ही कामे संबधित यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्त्याच्या कामाबाबत आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शेत पाणंद रस्त्याचा आढावा ठेवण्यात आला. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाणंद रस्त्याची सुविधा ही आवश्यक असते. या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाप्पासाहेब नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपिलनाथ कलोडे यांच्यासह संबधित कार्यान्वीयन यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
News - Nagpur